"जि. प. शाळा आचरे उर्दू कथामालेचा अखिल भारतीय स्तरावर गौरव"
चिंदर/ प्रतिनिधी-
"जि. प. आचरे उर्दू शाळेची कथामाला गेले अर्धशतक साने गुरुजी कथामालेचे कार्य प्रेरणादायी करीत आहे. त्या शाळेतील मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे कथामालेविषयी असलेले प्रेम आणि योगदान भारतातील सर्व कथामालांना प्रेरणादायी असेच आहे. साने गुरुजींना अपेक्षित असे कार्य या कथामालेने केले आहे," असे गौरवोद्गार शामराव कराळे, अध्यक्ष अ.भा. साने गुरुजी कथामाला, मुंबई यांनी कथामालेच्या ५५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात अणदुर, उस्मानाबाद येथे काढले.
कथामालेचे ५५ वे राष्ट्रीय अधिवेशन शिक्षण महर्षी सि.ना. आतुरे गुरुजी नगरी, जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदूर तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथे पार पडले. यावेळी सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. जि. प. आचरे उर्दू शाळेला यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आदी देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर पन्नालाल खुराणा (ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते), सुधीर पुजारी (कार्यवाह कथामाला), लालासाहेब पाटील (कार्याध्यक्ष कथामाला) मधुकरराव चौधरी (माजी राज्यमंत्री) आदी जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कथामालेचा पुरस्कार जि. प. शाळा आचरे उर्दूचे शिक्षक श्री. आफताब जहीरुद्दीन पटेल, श्री. सय्यद मुस्ताक सय्यद मुसा, श्री. निसार युनुस सोलकर (मुख्याध्यापक), कु. मुहम्मद मुश्ताक सय्यद (विद्यार्थी प्रमुख) यांनी स्विकारला. त्यांचे सोबत श्री. रामचंद्र कुबल, दत्ताराम सावंत, समीर आचरेकर, रामकृष्ण रेवडेकर, रामचंद्र वालावलकर आदी कार्यकर्तेही उपस्थित होते.
"मालवण कथामालेच्या मार्गदर्शनाखाली आचरे उर्दू माध्यमाच्या कथामालेने यशस्वीपणे पार केलेल्या सुवर्ण महोत्सवी कथामाला कार्याचा हा पुरस्कार आहे," असे गौरवोद्गार उर्दू कथामालेचे अभिनंदन करताना अ.भा. साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष माननीय सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले.

Comments
Post a Comment